गारुडी
From Wikipedia, the free encyclopedia
सापगारुडी/मदारी ही एक भटकी जमात आहे. साप आणि नाग पकडणे हा त्यांचा व्यवसाय आहे. फिरत फिरत ते जेव्हा गावातील एखाद्या छोट्या मैदानवजा मोकळ्या जागेत येतात, तेव्हा ते ढोल पिटून गावातील मुलेबाळे जमा करतात. मुलांपाठोपाठ हळूहळू मोठेही येतात. पुरेशी माणसे जमा झाली की ढोल वाजवणे थांबते. मैदानावर दोनचार पेटारे व साप-नाग ठेवलेलेच असतात. तिथेच सापाच्या चपट्या करंड्याही असतात. मध्येच एखादा अजगर मोकळा सोडलेला असतो. आणि सापगारुडी/मदारी खेळ सुरू करतो. जादुगाराच्या प्रश्नांना तो न कंटाळता उत्तरे देत असतो. सापगारुडी/मदारी पत्त्यांची जादू करतो, रुमाल, रिबिनी रुपयाचे नाणे वगैरे अदृश्य करण्याचे खेळ करतो. आणि मग तो साप-मुंगुसांची लढाई लावतो. साप-मुंगुसांची बराच वेळ एकमेकांना चुकवाचुकवी झाल्यावर सापगारुडी/मदारी सापाला परत करंडीत बंद करतो. पुंगी वाजवून नागाला डोलवतो. आणि नंतर हंडीबागला झोपवून त्याच्यावर चादर अंथरतो. तो त्याला प्रेक्षकांपैकी कोणाच्या खिशात काय आहे ते विचारतो. उत्तरे अचूक आल्यानंतर लोकांचा सापगारुड्यावर विश्वास बसतो. सापगारुडी/मदारी नंतर कुठले तरी दंतमंजन किंवा औषध विकायला काढतो. आणि शेवटी कटोरा घेऊन प्रेक्षकांकडून पैसे जमा करतो.
सापगारुडी/मदारी ही खेड्यातीलच नाही तर शहरातल्या लोकांचीही अल्प पैशातली करमणूक असते. नागपंचमीच्या दिवशी सापगारुडी/मदारी नाग घेऊन घरोघर हिंडतात आणि नागासाठी दूध आणि पैसे गोळा करतात. मनेका गांधी यांनी भारतात चालविलेल्या पशु अधिकार चळवळीमुळे,व वन्यप्राणी क्रूरता नियंत्रण कायद्यामुळे व त्यात झालेल्या संशोधनामुळे (भारतीय प्राणी कल्याण कायदा-२०११) , हे खेळ बहुतांशी बंद झाले आहेत.