From Wikipedia, the free encyclopedia
मस्तानी | |
---|---|
जन्म | पन्ना राज्य, बुंदेलखंड |
मृत्यू |
इ.स. १७४० (एप्रिल) पाबळ, शिरूर तालुका,पुणे जिल्हा |
मृत्यूचे कारण | आजारपणामुळे |
चिरविश्रांतिस्थान | पाबळ, शिरूर तालुका,पुणे जिल्हा |
मालक | थोरले बाजीराव पेशवे (१७००–१७४०) पती |
कार्यकाळ | १६९९-१७४० |
राजकीय पक्ष | मराठा साम्राज्य |
धर्म | परशि॔न-मुस्लिम |
अपत्ये | समशेर बहादुर |
वडील | छत्रसाल बुंदेला (१६४९–१७३१) |
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजन्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंझावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक राण्यांपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली.
मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. राजा हिंदू. त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानाची मोठी झाली.. त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतीण वा वारयोषिता नव्हती.
मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होते. तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे. मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. त्याने मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.
मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इ.स. १७४० साली हे जग सोडून गेली. त्यांना समशेर बहादुर नावाचा मुलगा होता. ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात मस्तानी प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, संत मीराबाई, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिने अभ्यास केला होता.
मस्तानीचा मृत्यू इ.स.१७४० मध्ये, पेशवे बाजीराव २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. त्या धक्क्याने मस्तानीने विष प्राशन करून तिने आपल्या प्राणाची आहुती दिली.
मस्तानीचे समाधिस्थळ असलेले पाबळ गाव हे पुण्याजवळ आहे. समाधीची काळजी मस्तानीचे वंशज मोहम्मद इनामदार ह्यांच्याकडून घेतली जाते. १७४०मध्ये बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. पाबळ येथे तिचे दफन करण्यात आले. तो हिरा मिळवण्यासाठी व काही दागदागिने मिळतील या हेतूने १९९७-१९९८ व त्यानंतर जानेवारी २००९मध्ये अज्ञात चोरट्यांनी कबरीचे खोदकाम केले. साधारण ६ फूट खोल कबर खोदून चोरट्यांनी हा प्रकार केला. त्यांच्या हाती काही लागले नाही, पण कबरीची मोडतोड झाली. यानंतर पुरातत्त्व खात्याने किरकोळ डागडुजी करून कबर पुन्हा उभी केली खरी, पण मोडकळीस आलेल्या भिंती, परिसरात उगवलेले गवत यामुळे कबरीची सारी लयाच गेली आहे. मस्तानीचे स्मारक हा ऐतिहासिक ठेवा असल्याने ही वास्तू संरक्षित करण्याबाबत शासनाने एक ठराव केला होता. राजपत्रात हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पाबळ येथील मस्तानीची कबर संरक्षित स्मारक राहील व त्याची देखभाल पुरातत्त्व विभाग करेल, असा निर्णय झाला; पण अद्यापची त्याची अंमलबजावणी झालेली नाही. संदर्भ मस्तानी राहत असलेली जागा भुईसपाट झाली असून, आठ गढी असलेल्या महालाचा शेवटचा बुरूज २००१मध्ये सपाट झाला. या ठिकाणी 'मस्तानी गार्डन' उभारण्याचा मानस येथील मस्तानी फाउंडेशनने हाती घेतला आहे.
बाजीराव पेशवे-मस्तानी यांच्या प्रेम कहाणीचा साक्षीदार असलेल्या कसबे पाटस (तालुका - दौंड, जिल्हा पुणे) येथील राजवाडे, बारव, तलाव व ऐतिहासिक अनेक वास्तू मात्र सरकारकडून, इतिहास प्रेमींकडून उपेक्षितच राहिल्या आहेत.
बाजीराव पेशवे यांचे जहागिरी व वतन म्हणून पाटस या गावाचा इतिहासात उल्लेख आहे. बाजीरावने मस्तानीला शिरूर तालुक्यातील पाबळला नेण्यापूर्वी पाटस येथे वास्तव्यास ठेवल्याची अनेक कांदबऱ्या व ग्रंथात नोंद आहे. दोन ते तीन वर्षे मस्तानी पाटस येथे वास्तव्यास होती. बाजीराव हे मस्तानीला भेटण्यास पाटसला येत असत, अशी नोंद अनेक कादंबऱ्या व समकालीन ग्रंथांत असल्याचे आढळते. बाजीराव यांनी मस्तानीला पाटस येथे राजवाडा बांधून दिला होता. त्या वाड्याला आजही "मस्तानी वाडा‘ म्हणून ओळखले जाते. गावाच्या पश्चिमेला असलेल्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर पाण्यासाठी बारव (विहीर) बांधण्यात आली आहे. तिला "मस्तानीची बारव‘ म्हणले जाते. श्री आनंदेश्वर मंदिर व त्यालगत तलाव बांधला असून, त्याला "मस्तानी तलाव‘ म्हणून ओळखले जाते. मस्तानी वाड्याची दुरवस्था झाली आहे. वाड्यासमोर त्याकाळापासून दर्गा आहे. हा दर्गा मस्तानीच्या जवळच्या सेवेकऱ्यांचा असावा, असे सांगण्यात येते. बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमकहाणीचा साक्षीदार असलेल्या पाटस येथील अनेक वास्तू सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
बाजीरावांना मस्तानीपासून समशेरबहाद्दर ऊर्फ "कृष्णराव" हा पुत्र झाला. मस्तानीचा पुत्र समशेर बहादर याला पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचे स्थान लाभले. १७६१ साली पानिपतावर तो प्राण पणाला लावून लढला व धारातीर्थी पडला. पेशवे कुटुंबाला त्याचे अतीव दुःख झाले. त्याचा पुत्र अलिबहादूरसुद्धा शूर होता. त्याला ‘श्रीमत्’ म्हणले जाई. श्रीमंत म्हणजे पेशवे व श्रीमत् हे परिवारातील सदस्य अशा उपाध्या होत्या. १७८८ साली मध्य प्रदेशातील बांदा येथे मस्तानीच्या शाखेला जहागिरी देण्यात आली. महादजी शिंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नाना फडणविसाने अलिबहादूरला पाठविले होते. कारण बाजीरावाच्या रक्ताची भीती मराठा सरदारांना होती. राघोबाने आपल्याच पुतण्याचा खून केला. १८५७ च्या संग्रामात बांद्याचा नवाब झांशीची राणी व नानासाहेब पेशवा यांच्या बाजूने लढला. बंडानंतर बांदा संस्थान खालसा झाले. तेथील नवाबास पेन्शन देऊन इंदूरला आणून बसविण्यात आले. प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब हा मस्तानीच्या नात्याचा होता.
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.