From Wikipedia, the free encyclopedia
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (जीवनकाळ : इ.स.चे १७ वे शतक) हे छत्रपती शिवाजीराजांच्या काळातील मराठा दौलतीचे पंतप्रधान, अर्थात पेशवा होते. स्वराज्याचे प्रथम पेशवा असलेले मोरोपंत हे देशस्थ ब्राह्मण होते. त्यांच्यानंतर पेशवेपद त्यांच्या मुलाकडे गेले. त्यानंतर बालाजी विश्वनाथ हे कोकणस्थ ब्राह्मण तिसरे पेशवा नियुक्त करण्यात आले.
इ.स. १६५९ च्या प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानास मारल्यावर विजापुरी सैन्यावर मराठा फौजांनी हल्ला चढवला, तेव्हा मोरोपंत त्र्यंबक पिंगळ्यांनी सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व केले. फेब्रुवारी, इ.स. १६७१ च्या सुमारास त्यांच्या सेनापतित्वाखालील मराठा फौजांनी मुघलांच्या ताब्यातील पश्चिम खानदेश व बागलाण या प्रदेशांत चढाया केल्या.
इ.स. १६७२मधील उत्तर कोकणातील कोळी राज्यांविरुद्धच्या मराठा मोहिमेचे नेतृत्व पिंगळ्यांनी केले[1]. या मोहिमेत ५ जून, इ.स. १६७२ रोजी मराठ्यांनी कोळ्यांचा राजा विक्रमशाहाच्या सैन्याचा पराभव करत जव्हाराचा पाडाव केला. त्यानंतर मराठा सैन्याने उत्तरेस रामनगराकडे कूच केले. मराठा आक्रमणामुळे रामनगराचा कोळी राजा सोमशाह परागंदा झाला. मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे व मुघल सेनापती दिलेरखानाच्या सैन्याची जुळवाजुळव सुरू झाल्याने पिंगळ्यांनी रामनगरातून माघार घेतली. सैन्याची पुन्हा जुळवाजुळव करून जुलै, इ.स. १६७२ च्या सुमारास पिगळ्यांच्या सेनापतित्वाखाली मराठ्यांनी रामनगरचा मुलूख जिंकून घेतला.
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे शिवाजीराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर त्यांना देखरेख ठेवावी लागे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागे, यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन इतका पगार मिळत असे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.