राम जगन्नाथ जोशी
From Wikipedia, the free encyclopedia
"राम जगन्नाथ जोशी" किंवा "लोकशाहीर राम जोशी"(जीवनकाळ: १७६२ ते १८१३) हे सोलापुरातील कवी होते. 'सुंदरा मनामधी भरली' ह्या व अशाच प्रसिद्ध तमाशाप्रधान लावण्यांचे रचयिता व गायक ते आहेत. रामजोशींच्या फडात बया आणि चिमा अशा दोन नाचणाऱ्या तमासगिरिणी असत.
रामजोशींचे थोरले बंधू म्हणजे मुद्गलशास्त्री होत. हे नावाजलेले शास्त्री आणि पुराणिक होते. वडील निर्वतल्यावर रामजोशींना त्यांनीच सांभाळले. रामजोशींना लहानपणापासूनच तमाशाचा छंद होता. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस नव्हता. घरासमोरच धोंडिबा शाहिराचा फड होता. रामजोशी नेहमी तिकडे जाऊन बसत. त्यामुळे त्यांना लावण्या रचण्याचा व डफावर गाणी म्हणण्याचा षोक लागला. वयाची विशी उलटून गेली तरी संस्कृत भाषेचा गंध नसलेल्या रामजोशींना, मुद्गलशास्त्रींनी घरातून घालवून दिले. तेव्हा रामजोशी नेसत्या वस्त्रानिशी पंढरपूरला गेले आणि त्यांनी तिथे वेदशास्त्रसंपन्न बाबा पाध्ये यांचे शिष्यत्व पत्करून काव्यालंकार आणि व्याकरणशास्त्र यांचा अभ्यास केला.
गुरूंची अनुज्ञा घेऊन रामजोशी सोलापूरला परतले. तेथे वडील बंधू आजारी असल्याचे पाहून रामजोशींनी त्यांच्याऐवजी देवळांत पुराण सांगायला सुरुवात केली. पुराण सांगण्याची त्यांची अनोखी धाटणी पाहून सोलापूरकर आणि मुद्गलशास्त्रीही प्रसन्न झाले. इ.स. १७९३ पासूनच्या पुढील काळात रामजोशी उत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध पावले.
रामजोशींचा बारामतीला बाबुजी नाईक यांच्या वाड्यात तमाशा होता. त्यावेळी त्यांनी गायलेल्या 'भला जन्म हा तुला लाधला' आणि 'दो दिवसांची तनु ही साचीc या दोन वैराग्यपर कवनांनी तिथे असलेले मोरोपंत संतुष्ट झाले. त्या दिवसापासून मोरोपंत आणि रामजोशी यांच्यामध्ये एकमेकांविषयी आदर व स्नेह वाटू लागला, आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. रामजोशींनी मोरोपंतांच्या आर्या आपल्या कीर्तनांतून लोकप्रिय केल्या. या पुढील काळातील रामजोशींच्या काव्यरचनेवर मोरोपंतांची बरीच छाप आहे.
रामजोश्यांना मराठीखेरीज कानडी, हिंदी आणि संस्कृत या तीन भाषा उत्तमरीत्या येत होत्या.
संस्कृताध्ययन, यमक-अनुप्रासांची लयलूट, संस्कृत-प्राकृत शब्दांच्या मिश्रणाने घडून आलेली भाषेची सजावट, शीघ्रकवित्व, समयसूचकता आणि प्रभावी वक्तृत्व आदी गुणांमुळे रामजोशी यांची कीर्तने अतिशय लोकप्रिय झाली. एकदा त्यांचे कीर्तन ऐकून एका सावकाराने त्यांना ५ हजाराचे बक्षीस दिले.
शंकराचार्यांनी रामजोशींना बहिष्कृत करावे असा पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांचा आग्रह होता. परंतु शंकराचार्यांसारख्या पुरुषाला रामजोशींनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने आणि काव्यरचनेने संतुष्ट केले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात काशीरामेश्वरपर्यंत ज्यांचा लौकिक पसरला होता असे नीलकंठशास्त्री थत्ते नावाचे एक याज्ञिक पंडित होते. पुण्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्या सभेत नीलकंठशास्त्री आहेत, तेथेच रामजोशींचे कीर्तन ठेवले. ते जाणून रामजोशींनी यज्ञशास्त्राची जमेल तितकी माहिती गोळा केली, आणि त्या सभेत त्या माहितीचा उपयोग करून बसविलेल्या लावण्या कटिबंधाच्या चालीवर म्हटल्या. त्या ऐकून थत्तेशास्त्रींनी खुश होऊन आपल्या अंगावरची शाल रामजोशींना पांघरून त्यांचा गौरव केला.
रामजोशी उत्तरायुष्यात कविवर्य मोरोपंतांच्या उपदेशावरून अध्यात्मात रममाण झाले.