बाळाजी विश्वनाथ
मराठा साम्राज्याचे पेशवे / From Wikipedia, the free encyclopedia
बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख ( इ.स. १६६२ – एप्रिल २, १७२०), किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ पराक्रमी योद्धा व मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.
बाळाजी विश्वनाथ | ||
---|---|---|
पेशवा | ||
पर्वती येथील बाळाजी विश्वनाथ यांचे चित्र | ||
मराठी साम्राज्य | ||
अधिकारकाळ | नोव्हेंबर १७, १७१३ - एप्रिल २, १७२० | |
अधिकारारोहण | नोव्हेंबर १७, १७१३ | |
राजधानी | पुणे | |
पूर्ण नाव | बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख (पेशवे) | |
पदव्या | छत्रपतींचे सेवक | |
जन्म | १६६२ (तारीख अनिश्चित) | |
श्रीवर्धन, रायगड जिल्हा | ||
मृत्यू | एप्रिल २, १७२० | |
सासवड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | परशुराम त्रिंबक कुलकर्णी | |
छत्रपती | छत्रपती सम्राट शाहू महाराज | |
उत्तराधिकारी | थोरले बाजीराव पेशवे | |
वडील | विश्वनाथ परशुरामपंत (भट) देशमुख | |
पत्नी | राधाबाई | |
संतती | थोरले बाजीराव पेशवे, चिमाजी आप्पा | |
राजघराणे | पेशवे |
महादजी विसाजी देशमुख हे बाळाजींचे पणजोबा व भट घराण्याचे ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथांचे वडील व आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणतात. १५७५ च्या सुमारास महादजींकडे ही परंपरागत देशमुखी होती. महादजींस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजींस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हे बाळाजीचे पिता. बाळाजींना ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.
देशमुखीचे घराणे असल्याने बाळाजींस मोडी वाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ ह्यांच्याशी बाळाजींचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली, त्यामुळे बाळाजींला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्ऱ्यांना सामील आहे या संशयाने सिद्दने भट घराण्याचा छळ चालू केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालून समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबाबरोबर साताऱ्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरू केल्यावर मुरूड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवून एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो.
बाळाजींबरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाऊ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हे "नाना फडनीस" यांचे आजोबा. (भट) देशमुख -फडनीस-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मोगलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्यांच्या हत्येच्या प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथांचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्यांचा पालखीत बसले आणि कटवाल्यांकडून मारले गेले. स्वामिनिष्ठेची ही पराकाष्ठाच होती.