हिंदू लग्न
From Wikipedia, the free encyclopedia
गाठविवाह हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पंधरावा संस्कार आहे. ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात.[1] पाणिग्रहण संस्कारास सामान्यतः हिंदू लग्न या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो. परंतु हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्नींदरम्यानचा तथाकथित जन्मोजन्मींचा संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती चार प्रदक्षिणा घालून व ध्रुव ताऱ्यास साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पतिपत्नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे.
हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे.
विवाह संस्कार हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार !
संसार रूप शकटाप्रति वाहणारी, चक्रेच दोन असती नर आणि नारी
यायास की सहचरत्व त्या द्वयास, आहे विवाहविधी जणू एक आस ....... असे या विधीचे काव्यात्म वर्णन केले आहे.[2]
विवाहाला पाणिग्रहण, उपयम, परिणय, उद्वाह अशीही नावे आहेत. पाणिग्रहण, म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात आपल्या हाती घेणे. उपयम म्हणजे वधूच्या जवळ जाणे किंवा तिचा स्वीकार करणे. परिणय म्हणजे वधूचा हात हाती घेऊन अग्नीला प्रदक्षिणा घालणे. उद्वाह म्हणजे वधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे. मानवी समाजातील ही सर्वात प्राचीन संस्था मानली जाते. विवाह ही केवळ कुटुंबातील महत्त्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. धर्मसंपत्ती आणि प्रजासंपत्ती असे विवाहाचे दोन उद्देश मानले जातात.[3]