छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान. हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई. From Wikipedia, the free encyclopedia
पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे़.
पुरंदर | |
गुणक | 18.17°N 73.59°E |
नाव | पुरंदर |
उंची | १५०० मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | सासवड |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | |
स्थापना | १३५० |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्व दिशेकडे काही फाटे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वरजवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.[1]
दोन भागांमध्ये विभागलेला आहे,
माची: हा किल्ल्याचा खालचा भाग आहे आणि येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, जसे की पुरंद्रेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर आणि दिल्ली दरवाजा.
बालेकिल्ला: हा किल्ल्याचा वरचा भाग आहे आणि येथे अनेक बुरुज आणि तटबंदी आहेत.
पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इन्द्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी नीलकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेन्दऱ्या बुरूज बांधतांना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरवर झाला.
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंहाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते. तेव्हा पुरंदरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी प्रभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरन्धर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.' मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.' दिलेरखानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात माणूस पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.
पुरंदर किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा किल्ला होता. हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे. तसेच आज हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.
किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणाऱ्या त्यांच्या अधिकाऱ्यांची अनुमती घेणे आवश्यक आहे. येथे जाताना कोणतेही ओळखपत्र घेऊन जावे (आधार कार्ड ,पॅन पत्र, मतदान ओळखपत्र इत्यादी)
जेवण्याची सोय स्वतः करावी लागते. पिण्याचे पाणी मात्र नेहमी सोबत ठेवावे कारण केदारेश्वर मंदिरात पाण्याची सोय नाही. गडावर जेवण करण्यासाठी आपण केदारेश्वर मंदिराच्या आवारात बसू शकतो.
हे ठिकाण गडावरील सर्वात उंच असल्यामुळे इथे वातावरण खूप छान आहे. एकत्रित स्नेहभोजन करण्यासाठी आपण या ठिकाणी नक्की यायला हवे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून १ तास लागतो.
पुरंदर किल्ला इतिहास, वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम आहे. तसेच ट्रेकिंगसाठी आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा पुरंदर किल्ल्याला, प्रत्येकाने नक्कीच भेट देईला हवी.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.