भाऊराव पाटील
महाराष्ट्रातील समाजसेवक आणि शिक्षण प्रसारक / From Wikipedia, the free encyclopedia
कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ - ९ मे १९५९) हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.
भाऊराव पाटील | |
---|---|
जन्म |
सप्टेंबर २२, इ.स. १८८७ कुंभोज, महाराष्ट्र |
मृत्यू |
मे ९, इ.स. १९५९ |
टोपणनावे | कर्मवीर |
पेशा | समाजसुधारणा, शिक्षणप्रसार |
प्रसिद्ध कामे | रयत शिक्षण संस्था |
मूळ गाव | कुंभोज, महाराष्ट्र |
पुरस्कार | पद्मभूषण (१९५९) |
भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहुजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत, ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत. [1]
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला.