येरवडा मध्यवर्ती कारागृह
पुण्याजवळील कारागृह, भारत From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
येरवडा मध्यवर्ती तुरुंग हा महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेला महासुरक्षित तुरुंग आहे. हा तुरुंग महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग आहे, तर दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. यात अंदाजे ३,६०० कैदी बंदिस्त राहू शकतात.
या तुरुंगात महात्मा गांधींपासून अजमल कसाबपर्यंत अनेक व्यक्ती येथे बंदिवासात होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकही ह्या तुरुंगात बंदिवासात होते.
Remove ads
रचना
हे कारागृह ५१२ एकर जागेत पसरलेले आहे.[१] इथे ५०००हून जास्त कैदी राहू शकतात आणि दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगात अत्याधिक सुरक्षा असलेल्या कैद्यांसाठी अंडा सेलसुद्धा आहेत.
इतिहास

येरवडा मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशांनी १८७१ मध्ये बांधले. तेव्हा येरवडा पुणे गावाबाहेर होते.[२]
ब्रिटिश राजवटीमध्ये या कारागृहात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कारावासात ठेवले होते. यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस,जोकिम अल्वा आणि लोकमान्य टिळक आणि भुरालाल रणछोडदास शेठ यांचा समावेश आहे.[२] १९२४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा येथे ठेवण्यात आले होते.[३] महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. विशेषतः १९३२ आणि नंतर १९४२ मध्ये चले जाव चळवळीच्या वेळी ते इथे होते. १९३२ मध्ये गांधीजींना अटक झाल्यावर त्यांना येथे ठेवण्यात आले होते. तेव्हा ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा घोषित केल्यामुळे गांधीजींनी आमरण उपोषणास सुरुवात केली. २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर गांधीजींनी हे उपोषण मागे घेतले.[४] मे १९३३ मध्ये गांधीजींची तुरुंगवासातून सुटका करण्यात आली.[५]
१९७५-७७ मध्ये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या अनेक राजकीय विरोधकांना या तुरुंगात ठेवण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, प्रमिला दंडवते आणि वसंत नारगोळकर यांचा सामावेश आहे.[६][७]
१९९८ मध्ये प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री बबनराव घोलप यांनी दाखल केलेला अब्रूनुकसानीचा खटला हरल्यावर काही काळ या तुरुंगात होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त २००७ मध्ये या तुरुंगात होता. तसेच स्टँप पेपर घोटाळ्यातील गुन्हेगार तेलगी या तुरुंगात होता.[८] २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात अटक केलेला दहशतवादी अजमल कसाब २००८ मध्ये या तुरुंगात होता. त्याला २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये येथेच फाशी देण्यात आले आणि दफन करण्यात आले.[९]
Remove ads
खुले कारागृह
येरवडा खुले कारागृह हे येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर याच आवारात आहे.जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ज्या कैद्यांनी शिक्षेची पाच वर्षे पूर्ण केली आहे आणि या काळात चांगले वर्तन दाखवले आहे, त्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवतात. येथे मूलभूत सुरक्षा असते आणि त्यांना कारागृहाच्या खोल्यांमध्ये ठेवले जात नाही.[१०] खुल्या कारागृहातील कैदी पाच गुंठे जमिनीत शेती पिकवतात. याशिवाय येथील गोठ्यात ३० गायी आहेत. त्यांचे शेण येथील शेतीसाठी वापरले जाते. खुल्या कारागृहातील महिला कैदीसुद्धा शेती करतात. विविध फळभाज्या, पालेभाज्या, भात, हरभरा इ.ची लागवड केली जाते. भाज्या कारागृहातील स्वयंपाकघरासाठी वापरल्या जातात.[११]
विविध उपक्रम
गांधीजींच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी येरवडा कारागृहात एक उपक्रम राबवला जातो. याची सुरुवात २००२ असीम सरोदे यांनी केली. या उपक्रमांतर्गत कैद्यांना वर्षभर गांधीजींची विचारसरणी शिकवली जाते. वर्षाच्या शेवटी ‘गांधी विचार परीक्षा’ घेतली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश ऐच्छिक आहे.[१२]
कारागृहातील कैदी दररोज ५००० कपडे तयार करतात. कारागृहात कैद्याच्या पुनर्वसनासाठी नागरिकांसाठी कैद्यान्द्वारे इस्त्री विभाग चालवला जातो, तसेच केशकर्तनालयसुद्धा चालवले जाते.[१०][१३]
Remove ads
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads