ज्ञानेश्वर
मराठी संप्रदायाचे प्रवर्तक, महाराष्ट्रातील एक थोर संंत / From Wikipedia, the free encyclopedia
संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (जन्म : आपेगाव-पैठण, युव नाम संवत्सर, श्रावण वद्य अष्टमी, गुरुवार दि. २२ ऑगस्ट इ.स. १२७५, शालिवाहन शके ११९७, युगाब्द ४३७६; संंजीवन समाधी : दुर्मुख नाम संवत्सर, कार्तिक वद्य त्रयोदशी, रविवार दि. ०२ डिसेंबर इ.स. १२९६, शालिवाहन शके १२१७, युगाब्द ४३९७.)[1][2] हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. त्यांना ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते.
संत ज्ञानेश्वर महाराज | |
हे संत ज्ञानेश्वरांचे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि वारकरी संप्रदायाने अधिकृत केलेले चित्र आहे. संत ज्ञानेश्वरांची हीच मुद्रा भारत सरकारच्या पोस्टल सेवेने१९९७ मध्ये रु. ५/- चे संत ज्ञानेश्वरांचे पोस्टल स्टॅम्प प्रकाशित करताना वापरली आहे. तसेच हीच मुद्रा रु. १/- संत ज्ञानेश्वरांच्या नाण्यांवर देखील (१९९९) वापरली आहे. | |
मूळ नाव | ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (माऊली) |
जन्म | गुरुवार दि.२२ ऑगस्ट, श्रावण कृ.अष्टमी, शा.शके ११९७, (इ.स. १२७५), युगाब्द ४३७६. आपेगाव, (ता.पैठण ) जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. |
निर्वाण | रविवार ०२ डिसेंबर, कार्तिक कृ. त्रयोदशी, शा.शके १२१८, (इ.स.१२९६), युगाब्द ४३९७. |
समाधिमंदिर | आळंदी, जि.पुणे. |
उपास्यदैवत | विठ्ठल |
संप्रदाय | नाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय |
गुरू | श्री संत निवृत्तिनाथ महाराज. |
शिष्य | साचिदानंद महाराज. |
भाषा | मराठी |
साहित्यरचना | • ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), • अमृतानुभव, • हरिपाठ, • अभंग |
कार्य | समाज उद्धार |
वडील | विठ्ठलपंत कुलकर्णी |
आई | रुक्मिणीबाई कुलकर्णी |
फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली.[3] देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात.[4] संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत.[5][6] संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर