भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर From Wikipedia, the free encyclopedia
बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बॅंगलोर) भारताच्याकर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बेंगळूरू असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाव बंगलोर असेच समजले जाते.. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळूरचा लौकिक आहे. हे शहर बंगळूर जिल्हा व बंगळूर ग्रामीण जिल्हा अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.
या लेखात सत्यापनासाठीअतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीयसंदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते.
बंगळूरचा उल्लेख इ.स.च्या नवव्या शतकातील एका शिलालेखात आढळतो, इ.स. १०२४ च्या सुमारास चोळ साम्राज्यात हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर होयसळ, विजयनगर साम्राज्य इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. शहराची खरी स्थापना इ.स. १५३७ साली पहिला केंपेगौडा यांने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिरे बांधून केली. दुसऱ्या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. बंगळूर विजयनगर साम्राज्य जे एक जहागिरदार, केंपे गौडा 1 यांच्याद्वारे १५३७ मध्ये स्थापित केले गेले होते, त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, त्याला १६३८ मध्ये त्यांच्या उपसेनापती, शाहजी भोसले यांच्यासोबत रणदुल्लाखान यांच्या नेतृत्वाखाली आदिलशाही एका विजापूरच्या सेनेद्वारे बंगळूरवर आक्रमण केले गेले होता, ज्यांनी तिसरा केंपेगौडा यांना पराजित केले आणि बंगळूरचे शाहजी यांना जहागिर (संपत्ती) च्या स्वरूपात बहाल केली गेली होती.[संदर्भ हवा ] शहाजीराजांना बंगलोर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिक्कपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. इ.स. १६८७ साली कासीमखानाने मोगलांचे सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र व्यंकोजी भोसले याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासीमखानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख म्हैसूरचा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकली. दुसऱ्या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगलोरची जहागीर त्याचा सुभेदार हैदर अली याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. इ.स. १७९१ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हैदर अलीचा पुत्र टिपू सुलतान यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.[संदर्भ हवा ]
बंगळूर शहर कर्नाटक राज्याच्या आग्नेय भागात आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूरमध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत. इ.स.च्या सोळाव्या शतकात बंगलोरचा शासक केंपेगौडा याने शहराच्या पाणी समस्येवर उपाययोजनेसाठी तळ्यांची निर्मिती केली.
बंगळूर शहरातील तळी
आगरा तलाव
उल्सूर तलाव
जागरणहल्ली तलाव
पुटेनहल्ली तलाव
बेलंदूर तलाव
मडिवळा तलाव
लालबाग तलाव
बेंगळूर समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे, येथील हवामान आल्हाददायक व अनुकूल आहे. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना असतो, तर एप्रिल उष्ण असतो. बंगळुराचे सर्वोच्च तापमान ३८.९°सेल्सियस इ.स. १९३१ साली नोंदले गेले, तर नीचांकी तापमान ७.८ °सेल्सियस इ.स. १८८४ साली नोंदले गेले.
बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. वालचंद हिराचंद यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची कार्यालये येथे आहेत.
बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली टेक्सास इंस्ट्रुमेंट्स कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. इन्फोसिस, विप्रो टेक्नॉलॉजीज इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवआर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे.
रस्तेवाहतूक
मॅजेस्टिक हे मुख्य बस स्थानक आहे. बंगळूर मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीच्या बसेस प्रवाश्यांची शहरांतर्गत वाहतूक करतात. ऑटोरिक्षा आणि खासगी बससेवाही प्रचलित आहेत.
रेल्वे वाहतूक
मुख्य रेलवे स्टेशन मॅजेस्टिकजवळ आहे.बंगळूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जावे व त्याला कर्णधार विराट कोहली ह्याचे नाव देण्यात यावे अशी मागणी आहे.
बंगलोर हे हे १९८४ सालापासून भारतातील विविध राज्यांतील पक्षातून फुटलेल्या, फुटू पाहणाऱ्या, दुसऱ्या पक्षात जाऊन आपल्या राज्याचे सरकार पाडण्यास उत्सुक असलेल्या अशा आमदारांचे बिनखर्चात चैनीत राहण्याचे ठिकाण आहे. बंगलोरमधील विलासात राहण्यास बांधलेल्या अनेक आश्रयस्थानांमध्ये वरील प्रकारच्या आमदारांना, सुखाचे, चैनीचे आणि आरामाचे आयुष्य देण्याच्या मिशाने कैदेत ठेवतात. सन १९८४पासून हा प्रकार चालू आहे. या आमदारांना बाहेरच्या कोणाशीही टेलिफोननेही संपर्क करता येत नाही, कुणाही बाहेरच्या व्यक्तीला भेटता येत नाही, किंवा आश्रयस्थानांतून बाहेर पडता येत नाही. त्यांना आतल्या आत हवी ती चैन करता येते आणि हवी तितकी फुकत दारू ढोसता येते. आश्रयस्थानाचे भाडे प्रतिदिवशी प्रतिआमदार ६ ते ७ हजार रुपये असते. आश्रमस्थानात राहणाऱ्या या सर्व आमदारांचा खर्च अंदाजे आठवड्याला प्रतिआमदार ५० ते ७५ कोटी रुपये असतो. हा खर्च त्यांंना ज्या पक्षाने पळवून आणले आहे तो पक्ष करतो, आणि नंतर तो सामान्य जनतेकडून वसूल करतो.
तेलुगू देसम पक्षाचे मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांनी, रामकृष्ण हेगडे हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना, आपल्याच NTD पक्षाच्या १६१ आमदारांना, ते फुटीर नेते नरेंद्र भास्कर राव (Nadendra Bhaskar Rao) यांच्या गटात सामील होतील करतील या भीतीने बंगलोरला नेऊन ठेवले होते.
जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेस प्रणीत लोकशाही आघाडीया सरकारला, विधानसभेत अविश्वासाच्या ठरावाला तोंड देण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या ४० आमदारांना बंगलोरला नेऊन ठवले होते. त्यावेळी एस.एम. कृष्ण हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. आमदारांची नेण्या-आणण्याची, राहण्याची, त्यांची खातिरदारी करण्याची सर्व जबाबदारी डी.के. शिवकुमार यांनी सांभाळली होती.
२००४ साली कर्नाटक राज्यात भारतीय पक्षाला ७९ जागा मिळवून तो सर्वात जास्त आमदार निवडून आणणारा पक्ष ठरला. पण स्पष्ट बहुमत नसल्याने व इतर आमदारांची साथ न मिळाल्याने भाजपला सरकार बनवता आले नाही. अश्या वेळी ६५ जागा मिळवणाऱ्या कॉंंग्रेसने आणि ५८ आमदार असलेल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाने युती करण्याचे ठरवले. पण ती होईपर्यंत आपले आमदार फुटून भारतीय जनता पक्षाला मिळू नयेत म्हणून जद(से)ने आपले ५८ आमदार बंगलोरबाहेरच्या एका आश्रयस्थानात नेऊन ठेवले. ही सर्व परिस्थिती जदसे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बी.झेड. ज़मीर अहमद खान यांनी हाताळली.
काँग्रेसबरोबरची ही युती अल्पकाळच टिकली. २००६ साली जदसेने भाजपबरोबर युती केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि त्यांच्या जनता दल (सेक्युलर) या पक्षाने भाजपशी युती करण्यापूर्वी आपले आमदार फुटून काँग्रेसला मिळू नयेत म्हणून त्यांना बंगलोरबाहेरच्या एका आश्रयस्थानात नेऊन ठेवले. हीही परिस्थिती जदसे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बी.झेड. ज़मीर अहमद खान यांनी हाताळली.
पूर्ण बहुमत न मिळू शकल्याने सरकार बनवता न येण्याच्या परिस्थितीत, भाजप पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी जी. जनार्दन रेड्डी व अरविंद लिंबावली यांच्या मदतीने पहिल्यांदाच कॉंंग्रेसचे व जद(से)चे ७ आणि काही अपक्ष आमदार यांना लुभावून बंगलोरच्या हाॅटेलात नेऊन बंदोबस्तात ठेवले.
बेल्लारीच्या रेड्डी बंधूंनी भाजपच्या १८ आमदारांना पळवून नेऊन बंगलोरला नेऊन ठेवले. यामुळे कर्नाटकामधील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सरकार धोक्यात आले. काँग्रेसने आणि जद(से)नेही आपल्या आमदारांना त्यांनी पक्षांतर करू नये म्हणून बंगलोरच्या एका वेगळ्याच हाॅटेलात ठेवले.
काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या दुसऱ्यांदा होऊ घातलेल्या गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत, काँग्रेसने राज्यातील आपले आमदार बंगलोरजवळच्या बिदादी या गावात नेऊन ठेवले. हे काम त्यावेळी डी.के. शिवशंकर यांनी पूर्णात्वास नेले.
विभाजित बहुमतामुळे कर्नाटक विधानसभेत येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाला तोंड देण्यासाठी जद(से)ने आणि काँग्रेसने आपले आमदार बंगलोरमधील एका सुरक्षित निवासस्थानात नेऊन ठेवले. त्यांना योग्य वेळी विधानसभेत हजर केल्याने मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला.
कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस-जद(से) युतीच्या १३ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यांनी परत जाऊन कर्नाटक सरकार वाचवू नये म्हणून विरोधी पक्षाने (भारतीय जनता पक्षाने) काँग्रेसचे आपले व जद(से)चे एकूण १७ आमदार पळवले आणि त्यांना बीजेपीचे राज्यसभा सभासद राजीव चंद्रशेखर यांच्या खासगी विमानाने मुंबईला नेले. (६ जुलै २०१९) अशीही बातमी होती की त्यांना मुंबईहून गोव्याला नेण्यात येणार होते. काँग्रेसने बीजेपीवर खुल्लमखुल्ला आमदार खरेदीचा आरोप ठेवूनही भाजपने आपले 'कमळ अभियान' चालूच ठेवले. .. त्याचा परिणाम म्हणून बीजेपीच्या सी.एन. अश्वत् नारायण आणि सीपी योगेश्वर या या विश्वासू नेत्यांचा उदय झाला.
बीजेपीने मध्य प्रदेशच्या राज्यकर्त्या काँग्रेस पक्षातून १६ आमदारांना फूस लावून १० मार्च २०२० रोजी बंगलोरला नेऊन बंदिवासात ठेवले आहे. अजूनही (१९-३-२०२०पर्यंत) त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना विधानसभेच्या अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी हजर करण्यात येईल, असे भाजपने आश्वासन दिले आहे. राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी अधिवेशन बोलावून ताबडतोब विश्वासदर्शक ठराव पास करून घेण्याचा धोशा मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यामागे लावला आहे. कमलनाथ आणि विधानसभेचे सभापती (श्री.प्रजापती) हे या धोश्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात केस लढत आहेत. बंगलोरहून आमदार परतल्यावर त्यांंची व्यक्तिशः मुलाखत घेऊन त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती झालेले नाही याची खात्री झाल्याखेरीज विधानसभेचे अधिवेशन न बोलावण्याचा सभापतींचा निर्धार आहे. या १६ आमदारांपैकी मंत्री असलेल्या ६ आमदारांचा राजीनामा सभापतींनी स्वीकारला आहे.